टीईटी'चा निकाल जाहीर; 'इतके' शिक्षक ठरले पात्र
पुणे :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जानेवारी २०२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल बुधवारी (ता.५) जाहीर करण्यात आला आहे. यंदा ३ लाख ४३ हजार पैकी १६ हजार ५९२ शिक्षक या परीक्षेत उत्तीर्ण होऊन नोकरी मिळविण्यासाठी पात्र ठरले आहेत.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे २०१३ पासून 'टीईटी'चे आयोजित केले जाते. आत्तापर्यंत २०१६ वगळता इतर वर्षी परीक्षा झाली आहे.२०१९ ची परीक्षा १९ जानेवारी २०२० रोजी झाली होती. राज्यभरातून ३ लाख ४३ हजार २४२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. राज्यातील १ हजार ४४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती. या परीक्षेत प्रश्नपत्रिकेत शेकडो चुका निघाल्याने परिषदेच्या कामावर टीका करण्यात आली होती. अखेर यातून मार्ग काढता बुधवारी निकाल जाहीर केला आहे.
'टीईटी'च्या पेपर एकसाठी (इयत्ता १ली ते ५वी गट), १ लाख ८८ हजार ६८८ पैकी १० हजार ४८७ जण पात्र झाले आहेत. तर पेपर दोनसाठी (इयत्ता ६वी ते ८वी गट) १ लाख ५४ हजार ५९६ परीक्षार्थींपैकी ६ हजार १०५ जण पात्र झाले आहेत. आत्तापर्यंतच्या सहा परीक्षांमध्ये राज्यभरातील ८६ हजार २९८ शिक्षक या परीक्षेत पात्र ठरले आहेत.
इथे पाहा निकाल
https://mahatet.in या संकेतस्थळावर शिक्षकांना निकाल पाहता येईल. या परीक्षेच्या निकालाबाबत आरक्षण, वैकल्पिक विषय, अपंगत्व यासह इतर सुविधांचा लाभ मिळाला नसल्यास १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन तक्रार पुराव्यासह करावी, असे आवाहन परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.
वर्ष आणि पात्र शिक्षक
२०१३ - ३१०७२
२०१४ - ९५९५
२०१५ - ८९८९
२०१७ - १०३७३
२०१८ - ९६७७
२०१९ - १६५८२
0 Comments